14/03/2023
"माय मराठी"
माझी मातृ एकच असली तरी माझ्या मातृच्या तोंडी भाषा मात्र तीन होत्या... तिचं शालेय शिक्षण महाराष्ट्रात मराठी भाषेत कॉलेज चं शिक्षण मध्य प्रदेशात हिंदी भाषेत झालं...त्यामुळे तिची मराठी भाषा हिंडळलेली होती आणि आमच्या देखील तोंड वळणी पडली होती. आणि त्यात माझ्या वडिलांच्या दर तीन वर्षांनी होणाऱ्या बदल्या....त्यामुळे आमची भाषा देखील मराठी मिसळ या कटेगिरीत मोडत असे. पण काही म्हणा, मिसळ भाषेची गंमत आणि गोडी देखील न्यारीच आहे. या मिसळ भाषेचे घडलेले गमतीदार किस्से आम्ही कुटुंबियांनी खूपच अनुभवले आहेत. त्यातले काही प्रसंग तुमच्याशी share करते.
माझ्या आजोबांची महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात बदली झाली. तिथे कॉलनी मध्ये मराठी, गुजराथी, पंजाबी आणि बंगाली सर्व भाषेची कुटुंब गुण्यागोविंदाने नांदायची. आणि त्यांच्या संवादाची कॉमन भाषा हिन्दी होती. अस्सल मराठी भाषिक कुटुंबातून आलेली आजी लग्नानंतर १२ / १३ वर्षांनी डायरेक्ट रायपूरला मिसळीच्या डब्यात जाऊन पडली. माझे आजोबा कंपनीत एकदम फेमस आणि लोकप्रिय कॅरक्टर होते. संध्याकाळी कंपनीतून आले की हातपाय धुऊन कपडे बदलायचे, चहा पाणी झालं की थोडावेळ फिरायला आणि ब्रिज खेळायला जायचे. ठरलेल्या वेळी त्यांचा एक मित्र बोलवायला यायचा आणि विचारायचा, कुलकर्णी है की गया ? एकदा नेमकी आजी समोर आली, त्यांनी तिला पाहून विचारलं, कुलकर्णी किधर गया ? तिला हिंदीत कसं बोलायचं ? त्यांच्या प्रशनाला कस हिंदीत उत्तर द्यायचं हे काही सुचेना. तिने पटकन सांगून टाकलं, कुलकर्णी आया, चड्डी निकाला और घुमने गया. त्या माणसाने परत विचारलं, चड्डी निकालके? तिने सुद्धा confidently सांगितलं हा, चड्डी निकाला, उधर रक्खा और चला गया. तो विचारणारा माणूस पण चला गया, पण आजोबा घरात आल्यानंतर मात्र घरात जे हास्याचे स्फोट झाले, त्याची अजूनही सगळे आठवण काढतात. खरतर तिला विजार हा शब्द वापरायचा होता, पण विजारीला हिन्दी मध्ये काय म्हणतात ?, हे पटकन न सुचल्यामुळे तिने असं उत्तर दिलं. ही घटना घडली त्यावेळी आमचा तर जन्म देखील झाला नव्हता, ती आजी आता ऐंशी वर्षांची झाली तरीदेखील आमच्या घरात अजूनही तिला ही आठवण काढून चिडवतात.
लग्नानंतर आई महाराष्ट्रात रहायला आली. आई बाबा नोकरी निमित्त अलिबागला रहायला होते. तिथे एका दुमजली वाड्यात ते भाड्याची खोली घेऊन रहात होते. त्यांची खोली वरच्या मजल्यावर होती. लग्नानंतर त्यांची आई म्हणजे माझी आजी लेकाचा नवीन संसार आणि नवीन घर बघायली आली. माझ्या आईने प्रवासातून आलेल्या आजीला सांगितलं, बाथरूम खाली आहे, तुम्ही अंघोळ करणार असाल तर करून घ्या. आजीने विचारलं, "बाथरूम खाली आहे का ?" आई म्हणाली, "हो हो खाली आहे, म्हणूनच म्हणलं लवकर अंघोळ करून घ्या." एवढं सांगून माझी आई स्वयंपाक घरात कामाला गेली. बाहेर येऊन बघते तर आजी घरात नाही. आईने हाका मारून पूर्ण घरात बघितलं, आजूबाजूला विचारलं, पण आजी तिथेही नव्हती. आई एकदम घाबरली, तिला काय करावं सुचेना, तितक्यात आजी जिन्यातून वर येताना दिसली. आईने घाबरून विचारलं, कुठं गेला होतात ? आजी म्हणाली, "अगं, खाली गेले होते अंघोळीला." आईने विचारलं, खाली कशासाठी गेलात ? आजी म्हणाली अगं तूच सांगितलं ना, न्हाणीघर खाली आहे म्हणून ! नवीन सूनबाई एकदम बावरली आणि म्हणाली, "मी कुठे म्हणाले खाली आहे ? मी फक्त सांगितलं खाली आहे....म्हणजे वरतीच आहे, पण खाली आहे. या वर आणि खालीच्या गोंधळात नंतर आजीच्या लक्षात आलं की 'खाली' याचा अर्थ 'रिकामं' असा होता !
सासरी इनामदारांच्या घरात आईची माहेरची कुलकर्णी मिसळ जरा नवीनच होती, त्यात नवीन सुनेने पहिल्यांदाच घरी आलेल्या सासूला अंघोळीसाठी घराबाहेर काढलं, त्यामुळे "मिसळीचा कट" किती जळजळीत असेल याची कल्पनाच केलेली बरी. आजी शिक्षिका होती, तिने हा मिसळीचा कट गोड मानून समजून घेतला हे नशीबच म्हणायचं.
माझी मावशी लग्नानंतर मात्र मध्यप्रदेशात कायमची स्थायिक झाली. तिच्या घरी सगळे हिंदीतूनच बोलत असत. सुट्टीत सगळे मामा, मावशी आणि आम्ही एकत्र आजोबांकडे भेटत असू. तेव्हा या मावस बहिणी आणि आम्ही हिंदी मिश्रित मराठीत संवाद साधत असू. त्यांच्या हिन्दी भाषेत बोलायला आम्हा इकडच्या भावंडाना मज्जा वाटायची, पण त्यांना मात्र आमच्याशी मराठीत बोलायला आवडायचं. यातून नवीनच भाषा आणि शब्द जन्माला यायचे. त्यांना स्वत:ला मराठी म्हणवून घ्यायला मनापासून आवडायचं. आम्ही त्यांच्याशी बोलताना मां - पिताजी वगैरे शब्द वापरले तर त्यांना राग यायचा, त्या म्हणायच्या ऐसे मत बोला करो यार, हम लोग घर मे आई बाबा ही बोलते है. मग काय, आमची भाषा अजूनच एकमेकांत घुसत गेली, म्हणजे आम्ही मराठी मिश्रित हिंदी बोलतोय की हिंदी मिश्रित मराठी बोलतोय हे न समजण्या इतके आम्ही एकरूप झालो. ती एकरूपता इतकी टोकाला गेली की एकदा माझ्या छोट्या भावाने त्याच्या वयाच्या मावस बहिणीला इकडून नको, तिकडून जा हे "तुम यहाँ से नही, त्यहां से जाओ" या शब्दांत सांगीतलं. एकदा सगळी TV समोर बसली होती असताना जागेवरून तु तु मै मै झाली. रागाच्या भरात माझा भाऊ एका बहिणीला म्हणाला, "तुम पैर फका के मत बैठो, इधर जागा कम है. मांडी आवळ के बसो"
कर्मधर्म संयोगाने माझ्याही वाटेला देखील आई सारखं कॉलनी मधलं बालपण आलं. तिथे भाषा मराठी असली तरी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातले, तसेच वेगवेगळ्या राज्यांमधले शेजारी पाजारी होते. त्यामुळे हे मराठी कॉकटेल ची मुळं अगदी सहजच रूजली. अगदी लहानपणी नाशिक जिल्ह्यात शाळेत असताना "हे असं कराच, ते तसं कराच - जाचं आणि लगेच परत याचं" यासारखी भाषा मी देखील बोलायला लागले.
शाळेच्या काही वर्षांमध्ये तिलारीनगर इथे आम्ही रहायला होतो, त्या कॉलनीत कानडी भाषिक जास्त होते. त्यांच्या सोबत राहून मराठी भाषेत देखील कानडी हेल यायला लागली होती. एका कानडी काकूंची आणि आईची चांगलीच मैत्री होती. एकदा त्या घाबऱ्या घुबऱ्या होऊन आल्या आणि आईला म्हणाल्या, वैनी तुम्हाला कळलं का ? त्या अमुक तमुक बाईचं नवऱ्याबरोबर भांडण झालं आणि रागाच्या भरात तिने स्वत:ला वारून घेतलं की हो...आणि त्या रडायला लागल्या. आईला काही अर्थबोध होईना, तिने विचारलं, म्हणजे नक्की काय केलं ? "अहो, ते नसतंय का हो, ते घशाला दोरा बांधून स्वत:ला लटकून घेतात, ते केलं की हो तिने !" तेव्हा अर्थ कळला की त्या बाईने वारुन घेतलं म्हणजे आत्महत्या केली.
त्याच एकदा आईला आपल्या नवऱ्याची तक्रार सांगताना म्हणाल्या, "आमचे हेन्नी म्हणजे बाहेर दंगा, आणि घरात आले की नुसते हुप्प बघा." अशा आणीबाणीच्या वेळी आजूबाजूच्या शब्दांचा आधार घेऊन वाक्याचा अर्थ लावायचा ही लहानपणापासून सवय लागली.
अशाच एका शेजारी काकूंना आईने विचारले, तुमच्या घरात कसला आवाज येतोय ? त्या म्हणाल्या, "अहो संजूला हेन्नी बडवलाय, म्हणून तो घनघोर रडायलाय !" आत्तापर्यंत 'घनघोर' फक्त लढाई होते एवढचं माहित होतं, रडणं सुद्धा 'घनघोर' असू शकतं हा नवीन शोध त्या दिवसापासून लागला.
बाबा एकदा ओळखीच्या घरी गेले. त्या काकूंनी समोर सरबताचा ग्लास आणला. बाबांनी नुकताच घरात चहा घेतला होता त्यामुळे त्यांनी "सरबत नको" असं सांगितलं. त्यावर त्या काकू अगदी सहज म्हणल्या, "आवो,पाणीच असतय की ते, पिऊन सोडा ओ."
कॉलेजात असताना आम्ही उरणला रहायला आलो. तिथे भाजी मार्केट, दुकानं ही आगरी लोकांची होती. त्यांचं बोलणं अगदी मोठ्या मोठयाने. सुरूवातीला कुणी अंगावर धाऊन येईल की काय? अशी भीती वाटायची, पण नंतर ती ही भाषा छान समजायला लागली. उरण च्या कॉलनीमध्ये नागपूर, चंद्रपूर,कोराडी या बाजूची कुटुंब अधिक होती, कालांतराने त्या भाषेची ही गोडी कळायला लागली. "चल न बे, जा न बे, काय करून राहिली ?" हे बे एके बे इतक तोंडी बसलं आणि गोड वाटायला लागलं की या वाक्यांमध्ये बोलायला काही चुकतंय असं चुकून देखील वाटलं नाही.
लग्नानंतर कोकणात आले, इथले पेशंट मालवणी भाषेत आरोग्याच्या तक्रारी सांगत, त्या समजून घ्यायला खूप अडचणी येत. दोनी डोके दुकतात म्हणाल्यावर मी बुचकळ्यात पडायची....डोकं तर एकच असतं ना, यांना पण एकच दिसतंय मग हे काय सांगतात ? नंतर कळलं, डोके म्हणजे गुडघे...तसच डोळ्यात दुकता...म्हणजे कंबर दुखते ... पण ती ही जमली लवकरच. आणि आता तर त्यांना काय म्हणायच आहे हे त्यांच्याच भाषेत विचारण्याइतकं प्रभुत्व आलयं त्या भाषेवर. इरीर्ता, पेटके येतत, हवाली लागता, जगाल भरता अशा कितीतरी शब्दांची माझ्या dictionary मध्ये भर पडली.
इतकंच कशाला कोकणी भाषा बोलणारे गोयेंकर ( गोवा ) किते करता गो ? आणि मालवणी मिश्रित हिन्दी बोलणारे मुसलमान पेशंट यांच्या भाषा देखील आता छान समजतात. सुरूवातीला एका पेशंटला इंजेक्शन देऊन झाल्यावर सवयीने त्या जागी स्पिरीटचा बोळा "चोळा" हे सांगण्याऐवजी मी हिंदीत "चोळो" असं सांगितलं आणि लक्षात आल्यावर कितीतरी वेळ एकटीच हसत बसले होते. आता मात्र मीच "जानारे क्या ? करनारे क्या ?" असं मी देखील त्यांच्याशी सहजपणे बोलते. काही समजावून सांगताना "देखो, ऐसा करने होना" असं बोलण्यात माझी जीभ चाचरत नाही. "ये तपासणी कर को लो, जरूरी है" असं सांगितल्यावर माझ्या पेशंटला त्यातली गंभीरता समजते, याहून दुसरं आणखी काय हवं ?
इतक्या वर्षात मागे वळून बघताना माझ्या लक्षात येतय, की बालपणापासून शुद्ध मराठी भाषेचं बाळकडू पिण्याऐवजी मिसळीच्या कटातच मी सामील झाले आहे. पण त्यामुळे वेगवेगळ्या भाषांच सौंदर्य, त्यांचा ठेका आणि ठसका अनुभवायला मिळाला. अर्थात त्यामुळे शुद्ध मराठी वरचं प्रेम कमी नाही झालं. या इतर भाषा देखील माय मराठीच्या बहिणी आहेत. आई पेक्षा मावश्यांची ओळख जरा लवकर झाली म्हणायचं. आता उशीरा का होईना, शुद्ध मराठी भाषा कशी असते हे समजायला लागलं हे ही नसे थोडके. मात्र माय मराठी इतक्याच तिच्या सगळ्या बहिणी आणि माझ्या सगळ्या मावश्या माझ्यासाठी तितक्याच प्रिय आहेत हे मात्र खरं.
@डॉ गौरी गणपत्ये